Ind vs Ban : शमी-राणाचा भेदक मारा, टीम इंडियाला विजयासाठी मिळाले २२९ धावांचे लक्ष्य
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील दुसरा सामना भारत विरूद्ध बांगलादेश असा रंगला आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २२८ धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या टॉप आर्डरने गुडघे टेकले. एकवेळ बांगलादेशची अवस्था ५ बाद ३५ अशी होती. तेव्हा तौहिद ह्रदय आणि जाकिर अली या दोघांनी बांगलादेशचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी दीडशतकी भागिदारी रचत कडवी फाईट दिली. तर तौहितने शतकी खेळी साकारली. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ गडी बाद केले. भारताला विजयासाठी २२९ धावा कराव्या लागणार आहेत.
बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावली. त्यानंतर मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरलेल्या भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन करत बांगलादेशच्या फलंदाजांना मोठा धक्का दिला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीतील २०० विकेट्स पूर्ण केल्या. सामन्याची सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली.
पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर मोहम्मद शमीने बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकारला (०) झेलबाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिले. त्यानंतर हर्षित राणाने दुसऱ्याच षटकात बांगलादेशचा कर्णधार शांतोला (०) विराट कोहलीकरवी झेलबाद करत दुसरा धक्का दिला.
सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शमीने मेहदी हसन मिराजला (५) स्लिपमध्ये उभ्या असलेल्या शुबमन गिलकरवी झेलबाद करत बांगलादेशचा डाव आणखी अडचणीत आणला. त्यानंतर अक्षर पटेलने आपल्या व्यक्तिगत पहिल्या आणि डावाच्या ९ व्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन विकेट्स घेत बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने, मुश्फिकुर रहिम (०) आणि तंझीद हसनला (२५) झेलबाद केले. विशेष म्हणजे, अक्षरला हॅटट्रिकची संधी होती, पण रोहित शर्माकडून झेल सुटल्याने ती हुकली.
संघाची स्थिती ५ बाद ३५ अशी असताना, मधल्या फळीतील फलंदाज तौहिद ह्रदय आणि जाकिर अलीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी मिळून १५० धावांची भागीदारी रचली. या जोडीने बांगलादेशच्या डावाला आकार दिला. ही जोडी धोकादायक होत असताना, मोहम्मद शमीने ४३ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जाकिर अलीला विराट कोहलीकरवी झेलबाद करत भागीदारी संपुष्टात आणली. अलीने ६८ धावांची खेळी साकारली. एका बाजूने एका पाठोपाठ फलंदाज बाद होते. तेव्हा तौहिद ह्रदयने एक बाजू लावून धरत शतक झळकावले. त्यांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशला सर्वबाद २२८ धावांपर्यंत मजल मारता आली. तौहिदने ११८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. भारताकडून शमीने ५ गडी बाद केले. हार्षितने ३ तर अक्षरने २ गडी टिपले.