नवी दिल्ली,१३ मार्च २०२४, प्रतिनिधी : यशस्वी जयस्वालच्या शिरपेचात आता अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कारण यशस्वीने आता आयसीसीचा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वातील तो अव्वल खेळाडू ठरला आहे.
भारताने फेब्रुवारीमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडवर मालिका विजय मिळवण्यासाठी दमदार संघर्ष केला. यामध्ये यशस्वीची भूमिका भारतासाठी महत्वाची ठरली. कारण फेब्रुवारी महिन्यात यशस्वीने तीन कसोटीमध्ये ११२ च्या सरासरीने ५६० धावा केल्या, अशी कामगिरी क्रिकेट विश्वात कोणालाही करता आलेली नाही. २२ वर्षीय यशस्वीने महिन्याची सुरुवात विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीत सुरेख द्विशतकाने केली, जिथे यशस्वीने पहिल्या डावात शानदार २०९ धावा ठोकल्या आणि भारतीय संघाने १०६ धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली. पण यशस्वी फक्त तेवढ्यावरच थांबला नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये झाला. या सामन्यातही यशस्वीचा फॉर्म कायम असल्याचे पाहायला मिळाले. यशस्वीने राजकोट येथील कसोटी सामन्यातही अर्धशतक झळकावले. यशस्वीने यावेळी २१ ४ धावांची स्फोटक फटकेबाजी केली.
यशस्वी जैस्वाल म्हणाला की, " हा आयसीसीचा पुरस्कार जिंकून मला खूप आनंद झाला आहे आणि मला आशा आहे की भविष्यात आणखीन बरेच काही मला मिळत राहील. ही माझी पहिली पाच कसोटी सामन्यांची मालिका होती आणि माझ्या सर्व संघ सहकाऱ्यांबरोबरचा हा एक अविश्वसनीय अनुभव होता. मी माझ्या सराव सत्रांमध्ये कठीण गोष्टी करणे सुरूच ठेवले आहे. माझ्या वरिष्ठांकडून मी शिकत आहे आणि मैदानात दमदार कामगिरी करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न मी करत आहे. राजकोटमध्ये द्विशतक साजरे करणे हे माझ्यासाठी खास होते. या खेळीने मला सर्वोच्च आनंद मिळाला होता."