विशाखापट्टणम, ०४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गाजवला. बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात विकेटचा षटकार ठोकला. त्याच्या धमाकेदार गोलंदाजीमुळे भारताने इंग्लंडचा डाव २५३ धावांमध्ये गुंडाळला आणि पहिल्या डावाच्या आधारावर १४२ धावांची मोठी आघाडी घेतली. बुमराहच्या याच दमदार गोलंदाजीचा भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीलाही भुरळ पडली आहे.
एक्स (ट्विटर) पोस्टमध्ये दादा म्हणतो की, जेव्हा मी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमारची गोलंदाजी बघतो तेव्हा मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की आपल्याला आता देशात फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या बनवण्याची काय आवश्यकता आहे? प्रत्येक सामन्याबरोबर चांगल्या विकेट्सवर खेळण्याचा माझा आत्मविश्वास अधिक दृढ होत आहे. तो पुढे म्हणतो की, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलच्या मदतीने आपण कोणत्याही खेळपट्टीवर २० विकेट्स मिळवू शकतो. गेल्या ६-७ वर्षात याच कारणामुळे घरच्या मैदानावर खेळतानाही फलंदाजांची हवा उडत आहे. पण तरीही भारत ५ दिवसात जिंकेल.
महत्त्वाचे मुद्दे -
- यॉर्करकिंग बुमराहचा विकेटचा ‘षटकार’ गांगुली दादा खूश
- बीसीसीआयला दिला सल्ला