मुंबई, ०८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: भारतीय क्रिकेटप्रेमींसासाठी एक आनंदाची बातमी आहे. रोहित शर्माचे कर्णधार म्हणून टी-२० फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले आहे. विराट कोहलीही पुन्हा एकदा टीम इंडियाकडून टी-२० फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंना अफगाणिस्तान विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत स्थान देण्यात आले आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नाहीत. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड देखील या मालिकेत दिसणार नाहीत. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांना यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे शेवटचे नोव्हेंबर २०२२ मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसले होते. या दोन खेळाडूंचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाल्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही खेळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर रोहित पुन्हा एकदा टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे -
- अफगाणिस्तानविरुद्ध रोहित, विराट संघात
- दोन्ही खेळाडूंचे ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळण्याचे संकेत