मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: नुकत्याच झालेल्या विश्वचषक २०२३ मध्ये विराट कोहली सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला होता. विराट कोहलीने २०२३ च्या विश्वचषकात ७६५ धावांसह सर्वाधिक करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. पण आता विश्वचषकानंतर विराट कोहलीच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का दिला आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. परंतु विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळण्यास नकार दिला आहे. विराट कोहलीनेही बीसीसीआयला आपल्या निर्णयाची माहिती दिल्याचे वृत्त आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहलीने बीसीसीआयला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याची माहिती दिली आहे. अशा प्रकारे तो केवळ कसोटी क्रिकेटमध्ये निवडीसाठी उपलब्ध असेल. भारतीय संघाचे पुढील मिशन दक्षिण आफ्रिका दौरा असेल, जिथे टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळेल. या दौऱ्याची सुरुवात १० डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होणार आहे. त्यानंतर १७ डिसेंबरपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल आणि त्यानंतर २६ डिसेंबरपासून टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.
सूत्राने सांगितले की, कोहलीने बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना सांगितले आहे की त्याला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांतीची गरज आहे आणि जेव्हा त्याला पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळावे वाटेल तेव्हा तो परत येईल. सध्या त्याने बीसीसीआयला सांगितले आहे की तो लाल बॉल क्रिकेट खेळणार आहे, म्हणजेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपस्थित राहणार आहे.