मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ३३ वा साखळी सामना मुंबईत वानखेडे स्टेडियम येथे सुरू आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात हा सामना होत आहे. भारताने ५० षटकांत आठ बाद ३५७ धावा केल्या. श्रीलंकेपुढे भारताने ३५८ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतीय संघाच्या शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांची शतकं अवघ्या काही धावांनी हुकली. पण तिघांच्या शानदार खेळीमुळे भारताने धावांचा डोंगर उभारला.
भारताकडून रोहित शर्माने ४, शुभमन गिलने ९२, विराट कोहलीने ८८, केएल राहुलने २१, सूर्यकुमार यादवने १२, श्रेयस अय्यरने ८२, मोहम्मद शमीने २ (धावचीत), रवींद्र जडेजाने ३५ (धावचीत), जसप्रीत बुमराहने नाबाद १ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने पाच तर दुष्मंथा चमीराने एक बळी घेतला.
विराट कोहलीचे विक्रम
एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ वे अर्धशतक
एका कॅलेंडर वर्षात आठव्यांदा एक हजार धावा
आशियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने आठ हजार धावा
श्रीलंकेविरुद्ध तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चार हजार धावा
सलामीला न येता विश्वचषकात सर्वाधिक वेळा अर्धशतके
यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय