मुंबई, २० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची घोडदौड सुरू आहे. ही घोडदौड सुरू असताना एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या घोट्याला दुखापत झाली आहे. बांगलादेश विरुद्धच्या साखळी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली. चेंडू अडवत असताना पाय घसरला आणि हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली. दुखापत झाल्यामुळे त्याने लगेच मैदान सोडले. हार्दिकवर वैद्यकीय उपचार सुरू झाले. बीसीसीआयने ट्वीट करून हार्दिकला दुखापतीची माहिती दिली.
हार्दिक पांड्या थेट लखनऊ येथे संघासोबत दिसेल. तोपर्यंत हार्दिक वैद्यकीय उपचार घेईल आणि विश्रांती घेईल, असे बीसीसीआयने सांगितले. भारत रविवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. हा सामना धरमशाला येथे होणार आहे. यानंतर थेट पुढल्या रविवारी भारत आणि इंग्लंड आमनेसामने असतील. हा सामना लखनऊ येथे होणार आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे आतापर्यंत चार साखळी सामने झाले आहेत. हे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्धचे सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडनेही विश्वचषकातील चार साखळी सामने जिंकले आहेत. यामुळे दोन्ही संघ आपली विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठी रविवारी मैदानात उतरणार आहेत.