पालघर, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी बहुप्रतीक्षित भारत - पाकिस्तान एकदिवसीय सामना आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी दुपारी दीड वाजता नाणेफेक होईल. अहमदाबादच्या मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी पश्चिम रेल्वेने शुक्रवार १३ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद अशी 'सुपरफास्ट स्पेशल ट्रेन' सोडण्याची घोषणा केली आहे.
०९०१३ मुंबई सेंट्रल अहमदाबाद स्पेशल ट्रेन मुंबई सेंट्रलहून शुक्रवार, १३ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ९.३० वाजता सुटेल, तर पालघर रेल्वे स्टेशनवर रात्री ११.०५ वाजता पोहोचणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता अहमदाबादला पोहोचेल. ०९०१४ अहमदाबाद - मुंबई सेंट्रल ही सुपरफास्ट स्पेशल ट्रेन हमदाबाद येथून रविवार, १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पालघर येथे सकाळी १०.१३ वाजता पोहचणार असून, दुपारी १२.१० वाजता मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचेल. या गाडीला दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सूरत येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यांचे आरक्षण सुरू आहे.
सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत न्यूझीलंड पहिल्या, भारत दुसऱ्या, पाकिस्तान तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर आहे.