नवी दिल्ली, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : तुम्ही इतिहास घडवला… या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एशियाड विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले. यंदाच्या एशियाडमध्ये भारताने २८ सुवर्ण, ३८ रौप्य, ४१ कांस्य अशी एकूण १०७ पदके जिंकली. पदक तालिकेत भारताने चौथे स्थान पटकावले. या कामगिरीसाठी पंतप्रधान मोदी यांनी एशियाड विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.
दिल्लीत पंतप्रधान मोदी यांनी एशियाड गाजवून आलेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. भारताच्या महिला खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीचे पंतप्रधान मोदी यांनी विशेष कौतुक केले. ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची १४० कोटी भारतीयांच्यावतीने स्वागत करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
एशियाडमध्ये भारताने पहिल्यांदाच १०० पदकांचा टप्पा ओलांडला. याआधी २०१८ मध्ये जकार्ता एशियाडमध्ये भारताने ७० पदके जिंकली होती. यात १६ सुवर्ण, २३ रौप्य, ३१ कांस्य पदकांचा समावेश होता.
नेमबाजी, अॅथलेटिक्स आणि तिरंदाजी या खेळात भारताने अनेक पदके जिंकली. क्रिकेट आणि कबड्डीमध्ये भारताने प्रत्येकी दोन सुवर्ण जिंकली. पुरुष हॉकी संघाने सुवर्ण जिंकले आणि २०१४ च्या ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला. स्क्वॉशमध्ये भारताने दोन सुवर्ण पदकांसह पाच पदके जिंकली. बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीतील ऐतिहासिक सुवर्ण पदकासह भारताने तीन पदके जिंकली.