नवी दिल्ली, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : तब्बल ११ महिन्यांनी जसप्रीत बुमराहने पुनरागमन केले आणि चक्क इतिहासच रचला. आजवर कोणत्याही भारतीय खेळाडूला जे जमलं नव्हतं ते जसप्रीत बुमराहने पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावावर करून दाखवत इतिहास रचला.
बुमराहने पहिल्याच सामन्यात मैदानावर उतरत कमाल केली. कारण पहिल्याच षटकात त्याने दोन बळी टिपले आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. तो इतक्यावरच थांबला नाही. तर त्याने प्रत्येक गोलंदाजाला संधी देत चांगलीच घडी बसवली. त्यामुळे भारताला पहिल्याच टी-२० सामन्यात आयर्लंडला १३९ धावांवर रोखण्यात यश मिळाले. पण ह्याच सामन्यात बुमराहने असा एक विक्रम रचला जो आजपर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडू करू शकलेला नाही आहे.
पुनरागमन करताच बुमराहला भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच सोनं करत भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात विजय मिळवून दिला. पहिल्याच सामन्यात संघाला विजय मिळवून देणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. इतकेच नाही तर पुनरागमन करताच पहिल्याच सामन्यात नेतृत्व करताना सामनावीर हा पुरस्कार पटकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. आजपर्यंत कोणत्याही भारतीय कर्णधाराला पहिल्या सामन्यात सामनावीर हा पुरस्कार पटकावता आलेला नाही.
आयर्लंड दौऱ्यात भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व बुमराहकडे सोपविण्यात आले आहे आणि पहिला सामना जिंकत त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. त्यामुळे आता पुढच्या दोन सामन्यांमध्ये बुमराहकडून अपेक्षा नक्कीच वाढलेल्या आहेत.