पुणे, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया संपूर्ण देशभर सुरू आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात आली. बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी ५१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन प्रमुख उमेदवारांसह या मतदारसंघात एकूण ५१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. शनिवारी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत सोमवारी २२ एप्रिल रोजी आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी बारामती लोकसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे.