Sunday, July 07, 2024 01:08:20 AM

'वाढदिवसाला हार पुष्पगुच्छ तुतारी नको'

वाढदिवसाला हार पुष्पगुच्छ तुतारी नको

मुंबई, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. आपल्याकडून या आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होऊ नये याची खबरदारी सध्या सर्वच राजकीय पक्ष घेताना दिसत आहेत. अनेक नेते आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुक काळात भव्य वाढदिवस साजरा केल्यास आणि या वाढदिवसाच्या समारंभात एखादी छोटी चूक घडल्यास त्याचे परिणाम संबंधित नेत्याला आणि पक्षाला सोसावे लागतात. त्यामुळे आता सर्वच नेते आपला वाढदिवस काळजीपूर्वक साजरा करताना दिसत आहेत. याचा प्रत्यय गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांच्या वाढदिवसाला आला.

तुतारीवर विशेष लक्ष
भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांचा 52 वा वाढदिवस सोमवारी छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आला. निवडणुकीचा माहोल आणि आचारसंहिता लक्षात घेता वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन संजीव नाईक यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. यात त्यांनी विशेष भर दिली होती ती म्हणजे तुतारी न वाजवण्यावर. हार, पुष्पगुच्छ आणि तुतारी न वाजवता साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करूया' असे आवाहन संजीव नाईक यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले गणेश नाईक यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे कार्यकर्ते आपल्या वाढदिवसानिमित्त तुतारी वाजवत नाही ना त्याची काळजी संजीव नाईक घेताना दिसत आहेत.

ठाणेच्या जागेसाठी संजीव नाईक यांचे नाव चर्चेत
महायुतीत कल्याण, भिवंडी, ठाणे या जागांबाबत अद्यापही तिढा कायम असल्याचे पाहायला मिळते. देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर केलं. मात्र, त्यानंतर काहीच दिवसात खुद्द श्रीकांत शिंदे यांनीच आपली उमेदवारी नक्की नसल्याचे माध्यमांसमोर सांगितलं. ठाणे जागेबाबत अद्यापही तिढा कायम आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला जाणार की भाजपच्या वाट्याला येणार हे ठरलेलं नाही. ही जागा भाजपला मिळाल्यास या जागेवर गणेश नाईक किंवा त्यांचे पुत्र संजीव नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून गणेश नाईक व संजय नाईक यांच्या नावाची चाचणी केली जात आहे.

२००९ ला ठाण्यातून खासदार
संजीव नाईक यांनी 1995 ते 2003 इतका प्रदीर्घकाळ नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली व ठाण्याचे खासदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये संजीव नाईक यांनी राष्ट्रवादी पक्षातून ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता 2024 मध्ये सुद्धा भाजप संजीव नाईक यांच्या नावाचा विचार करत आहे. त्यामुळेच संजीवना एक आपल्या वाढदिवसानिमित्त विशेष खबरदारी घेताना दिसून येत आहेत.


सम्बन्धित सामग्री