नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून सैनिक शाळांच्या खासगीकरणाबाबतचे पाऊल मागे घ्यावे आणि हे धोरण रद्द करावे, असे आवाहन केले आहे.
सशस्त्र दल आणि त्याच्याशी संबंधित संस्थांना नेहमीच राजकीय विचारसरणीच्या सावलीपासून दूर ठेवले जात होते, मात्र आता उलटे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. खरगे यांनी पत्रात म्हटले आहे की, भारतीय लोकशाहीने परंपरेने सशस्त्र दलांना कोणत्याही पक्षीय राजकारणापासून दूर ठेवले आहे.
काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, आरटीआयच्या उत्तरावर आधारित तपास अहवालात असे दिसून आले आहे की सरकारने सादर केलेल्या नवीन पीपीपी मॉडेलचा वापर करून सैनिक शाळांचे खाजगीकरण केले जात आहे. खर्गे यांनी दावा केला की, अहवालात असेही आढळून आले की स्वाक्षरी झालेल्या ४० सामंजस्य करारांपैकी ६२ टक्के स्वाक्षरी आरएसएस-भाजप-संघ परिवाराशी संबंधित व्यक्ती आणि संघटनांशी झाली आहेत. यामध्ये एका मुख्यमंत्र्यांचे कुटुंब, अनेक आमदार, भाजपचे अधिकारी आणि आरएसएसच्या नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने हे खाजगीकरण धोरण पूर्णपणे मागे घेऊन ते रद्द करण्यात यावे, जेणेकरून सशस्त्र दलाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना देशसेवेसाठी आवश्यक असलेला चारित्र्य, दृष्टी आणि आदर राखता येईल, असे आवाहन खरगे यांनी केले.