पुणे, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा करून आक्रमक पवित्रा घेतलेल्या विजय शिवतारे यांनी माघार घेतली आहे. महिन्याभरापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आक्रमक पवित्रा घेत बारामतीततून लढण्याची भाषा केली होती. मागील पंधरा दिवस ते आक्रमक भूमिकेवर ठाम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन वेळा चर्चा झाली तरी शिवतारेंनी माघार घेतली नव्हती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी खतगावकर यांनी शिवतारेंना फोन केला. 'तुमच्यासारखी भूमिका इतर मतदारसंघांमधील नाराज नेत्यांनी घेतली आणि सगळेच जण अपक्ष उभे राहिले तर काय होईल? तुमच्यामुळे राज्यभर चुकीचा संदेश जाईल. सगळीकडे बंडखोरी झाल्यास महायुतीचे १० ते २० उमेदवार पडतील. तुम्ही घेतलेल्या पवित्र्यामुळे महायुतीची आणि मुख्यमंत्री शिंदे यांची अडचण होत आहे' असे खतगावकर यांनी सांगितले. ही माहिती मिळताच क्षणार्धात माघारीचा निर्णय घेतला, असे शिवतारे म्हणाले. माझ्यामुळे महायुतीचे आणि मुख्यमंत्र्यांचे नुकसान होणार असेल तर तो प्रमाद माझ्या हातून घडायला नको; असे विजय शिवतारे म्हणाले.