मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबईत सागर बंगल्यावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी आठवलेंनी त्यांच्या पक्षाच्या मागण्या भाजपाला सांगितल्या. 'लोकसभेची जागा नाही तर केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद आणि विधानसभेत जागा, महामंडळे आणि इतर सत्तापदांमध्ये वाटा मिळावा. आम्ही रालोआमध्येच आहोत' असे रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. 'महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४५ जागा जिंकणे महत्त्वाचे आहे. यासाठी घेतलेल्या निर्णयांना समर्थन देऊ.' असेही रामदास आठवले फडणवीस यांना म्हणाले.