मुंबई, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत राशपचे शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही. त्यामुळे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली आहे. यात ज्येष्ठ नेते शरद पवारही सहभागी आहेत, ही अतिशय दुर्देवी बाब आहे. असे म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.
भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. शरद पवार ज्या काँग्रेसमध्ये एकेकाळी होते तो काँग्रेस पक्ष सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदलविण्यात आले. याचा आकडा पवार साहेबांकडे नक्कीच असणार असा घणाघात त्यांनी पवारांवर केला.
पुढे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील दहा वर्षात संविधानाचा सन्मानच केला आहे. पंतप्रधान मोदीजींनी संसद भवनाला संविधान सदन असं नाव दिलं आहे. भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहितासाठी काम केलं आहे. त्यामुळे जनतेनं कुठल्याही नेत्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. पवार साहेबांच्या तर अजिबातच नाही अशा शब्दात त्यांनी ट्विटरद्वारे पवारांची उलट तपासणी घेतली आहे.