जालना, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच, भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी शनिवारी मध्यरात्री अचानक आंतरवालीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. रात्री साडेअकरा वाजल्यापासून मध्यरात्री साधारण दीड वाजेपर्यंत दोघांमध्ये बैठक झाली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली.
सरकारकडून दबाव आणून आंदोलकांवर विनाकारण गुन्हे दाखल होत असल्याची तक्रार मनोज जरांगे यांनी चव्हाणांसमोर मांडली. सरकारकडून सगेसोयरेबाबत फसवणूक झाल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलंय. दरम्यान जरांगेंच्या मागणीबाबत चर्चा करून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे या भावनेने आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण आल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सरकारने फसवणूक केल्याचे आपण अशोकराव चव्हाण यांना सांगितले असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचं देखील सांगितले. तर येत्या २४ मार्च रोजी मराठा समाजाची बैठक बोलाविली आहे. त्यात मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.