पुणे, १२ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. साहेब मला माफ करा असे म्हणत वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहीत मनसेला अखेरचा राम राम केला. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते चांगलेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले वसंत मोरे?
'गेली २५ वर्ष शिवसेनेमध्ये राज ठाकरेंसोबत काम केलं. आज मनसेच्या सर्व पदांचा राजनामा दिला आहे. मी लोकसभा लढवण्यास इच्छुक आहे म्हणल्यानंतर मनसेमधील पुण्यातील यादी वाढत गेली. मनसेची पुण्यातील परिस्थिती नाजूक आहे. मनसे लोकसभा लढू शकत नाही, माझ्यावर अन्याय झाला, मग माझा कडेलोट झाला' असे वसंत मोरे यावेळी म्हणाले. 'माझा वाद राज ठाकरे यांच्याशी नाही. मनसेशी नाही. चुकीच्या लोकांच्या हाती शहर दिले. मला अनेकजण थांबवत होते. माझ्या कार्यकर्त्यांवर कारवाया होत होत्या. राज ठाकरे यांच्या मनातलं नाव हटवण्याचे काम कोअर कमिटीने केलं आहे. पक्षाचे वातावरण शहरात चांगले असताना इथले पदाधिकारी निगेटिव्ह आहेत, मी मनसेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, आता बाकी इच्छुक असणाऱ्यांना उमेदवारी द्यावी'
"साहेब मुंबईला असतात. पुण्यातील अनेक कार्यक्रमात मला डावलले जातं. मी पक्षात दहशतवादी आहे का? माझ्याबरोबर अनेक जण उभे राहायला घाबरतात. मला ऑफर्स खूप आहेत, कुठे जाणार हे भविष्यात कळेल येणाऱ्या दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेल," असे महत्वाचे विधान ही वसंत मोरे यांनी केले.