बारामती, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : ईडीकडून आमदार रोहित पवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बारामती अॅग्रोचा कारखाना जप्त करण्यात आला आहे. यावर राशप गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी ईडी कारवाईवरून केंद्र सरकारचा जोरदार समाचार घेतला आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी आतापर्यंत झालेल्या ईडी कारवायांची संपूर्ण आकडेवारीच मांडली आहे.
https://youtu.be/wqmHpbJmH8A?si=ffHkh7HhPaJXDdCW
रोहित पवारांवर झालेल्या कारवाईवर काय म्हणाले शरद पवार?
ईडी कारवाईवरून शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘यंत्रणांचा गैरवापर करून टोकाची दहशत निर्माण केली जात आहे. इतर राज्यांमध्ये देखील मंत्र्यांविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत आहे. रोहित पवार यांच्या कंपनीवर ईडीची कारवाई अयोग्य आहे. २००५ ते २०२३ या काळात ईडीनं एकूण ५ हजार ९०६ कारवाया केल्या. मात्र त्यातील फक्त २५ कारवायांचाच निकाल लागला. केंद्र सरकार दरवर्षी ईडीवर ४०४ कोटी रुपये खर्च करत आहेत. ईडीनं आतापर्यंत ज्या कारवाया केल्या आहेत, त्यातील जवळपास ८५ टक्के कारवाया या विरोधी पक्षातील नेत्यांवर करण्यात आल्या आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून १२१ विरोधी नेत्यांवर कारवाई झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.