प्रतिनिधी, पुणे, दि. ४ मार्च २०२४ : भाजपा नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मित्रपक्षाकडून धमकी येत असल्याचे पत्र लिहून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. त्यावर मित्रपक्षाने पाटलांचे आरोप फेटाळले आहेत.
हर्षवर्धन पाटलांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
भाजपा नेते पाटील यांनी गृहमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून मित्रपक्ष धमकी देत असल्याचे सांगितले आहे. इंदापूर तालुक्यातील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व संभामधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत तसेच मित्रपक्षांनी दिलेल्या धमकीमुळे सुरक्षिततेची चिंता वाटत आहे, असे पाटील यांनी फडणवीसांना पत्राद्वारे सांगितले. ही बाब अतिशय गंभीर असून यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक असून याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाई करण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
मित्रपक्षाने पाटलांचे आरोप फेटाळले
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार सामील झाले आहेत परंतु स्थानिक पातळीवर संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. यापूर्वी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले आहेत पण अजित पवार भाजपासोबत आल्याने या दोन्ही पक्षातील उमेदवारांना एकत्र काम करावे लागणार आहे. त्यामुळे राजकीय गणिते बदललेली दिसत आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना लक्ष केल्याचे दिसून येत आहे मात्र मित्रपक्षाकडून पाटलांचे आरोप फेटाळले आहेत.