मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशानंतर भाजपाने महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवायच्या उमेदवारांचे समीकरण तयार केले आहे. नव्या योजनेनुसार राज्यसभेतील मंत्री लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे तर विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातील सहा जागांवर राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी भाजपाकडून ज्या नऊ उमेदवारांच्या नावांची चर्चा आहे त्यांची नावं…
पंकजा मुंडे
चित्रा वाघ
विजया रहाटकर
विनोद तावडे
नारायण राणे
हर्षवर्धन पाटील
माधव भांडारी
अमरीश पटेल
संजय उपाध्याय
राज्यसभेतले मंत्री लोकसभेच्या रिंगणात आले तर नारायण राणे यांना सिंधुदुर्ग लोकसभा लढावी लागेल.
नारायण राणे लोकसभा लढणार असतील तर त्यांची राज्यसभेची दावेदारी संपुष्टात येईल.
सद्यस्थितीत नारायण राणे आणि विनोद तावडे असे दोन कोकणी मराठा नेते स्पर्धेत आहेत
नारायण राणेंशी स्पर्धा संपल्याने कोकणी मराठा असलेल्या तावडेंचा मार्ग मोकळा होईल.
विनोद तावडे या मराठा चेहऱ्याला हक्काच्या जागेवर संधी दिल्याने दुसरी संधी ओबीसी नेतृत्वाला द्यावी असा विचार पुढे येत आहे.
तावडेंसोबत पंकजा मुंडे यांना ओबीसी चेहरा या नात्याने राज्यसभेत पाठवले जाऊ शकते.
एक मराठा, एक ओबीसी असे नेतृत्व निवडल्यानंतर तिसरी हक्काची जागा धनसंपन्न शिक्षणसम्राट अमरीश पटेल यांना दिल्यास आश्चर्य वाटू नये.
चव्हाण भाजपात आल्याने राज्यसभेची चौथी जागा लढण्याची भाजपाने तयारी सुरु केली आहे.
चौथ्या जागेसाठी अतिरिक्त मतांची बेगमी करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर असेल.
सगळे समीकरण जुळून आले तर भाजपाकडून चार जणांना, शिवसेनेकडून एकाला आणि राष्ट्रवादीकडून एकाला अशा प्रकारे महायुतीकडून सहा जागांसाठी सहा उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे.
समीकरण जुळून आले भाजपाचे संभाव्य चार उमेदवार
विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजपा
पंकजा मुंडे, ओबीसी नेता
अमरीश पटेल, धनसंपन्न शिक्षणसम्राट
अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री