मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेसमधील सर्व पदांचा सोमवारी राजीनामा दिला. यानंतर दोन दिवस विचार करून निर्णय घेईन असे म्हणालेल्या अशोक चव्हाणांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आत अशोक चव्हाण भाजपावासी झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, गिरीश महाजन, हर्षवर्धन पाटील, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचे माजी आमदार अमर राजुरकर यांनीही भाजपात प्रवेश केला.
महाराष्ट्रातील अत्यंत ज्येष्ठ नेतृत्व, विधानसभा-लोकसभा ज्यांनी गाजवली, विविध मंत्रिपदं ज्यांनी भूषवलं, दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं, असे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश हा भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने महायुतीला फायदा होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
'नव्या राजकीय आयुष्याला सुरुवात करत आहे. तब्बल ३८ वर्ष विशिष्ट मार्गाने प्रवास केला. आता नवा मार्ग स्वीकारला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या आणि राज्याच्या विकासात योगदान देता यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. मी जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देतो. आगामी निवडणुकीत भाजपाला जास्तीत जास्त जागा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. मी कुणावरही टीका करणार नाही', असे अशोक चव्हाण म्हणाले. फडणवीस माझ्या मतदारसंघातील विकासाच्या आड आले नाहीत, असे एका प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपात काम करणार असल्याचे सांगितले.