राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्याला याही वर्षी राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत दिली गेली नाही. पुढील महिन्याभरात नवीन सोयाबीन बाजारात येणार आहे. मात्र आजही सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल चार हजार पाचशे रुपये इतके आहेत.
सोयाबीन लागवडीचा खर्च मागील वर्षी प्रति क्विंटल हा ५७०० रुपयांचा होता, यावर्षी तो साडेसहा हजाराच्या पलीकडे जाण्याची चिन्हे आहेत. असं असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला या मंत्र्यांना सामोर जावे लागले, त्याच धर्तीवर पुढील काळात राज्य सरकार आणि केंद्र सरकार मधील नेत्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.