जालना, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्यांची भेट घेतली. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. यामुळे वातावरण निवळलं. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
स्वतः मुख्यमंत्री गावात येऊन आंदोलकांसमोर बोलले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे वातावरण निवळले. याआधी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी लाठीमाराची घटना घडली होती. काही जणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली होती. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. या लाठीमारामुळे आंदोलक आणि राज्य शासन यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते. पण मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि जरांगेंशी चर्चा केली. नंतर वातावरण बदलले. जरांगेंनी सतरा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले.
मुख्यमंत्र्यांसोबत प्रमुख मंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंशी चर्चा केली. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याच्या मंत्रिमंडळातील निवडक वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबत राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर आणि दोन सरकारी अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे काय बोलले ?
१. शिंदे आपल्याला न्याय मिळवून देतील
२. मराठा आरक्षणाला केवळ शिंदेच न्याय देऊ शकतील
३. मी शिंदेंकडून आरक्षण मिळवणारच
४. मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही
५. मराठ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा