Tuesday, July 02, 2024 09:19:49 AM

शिंदे-फडणवीसांची वाढली डोकेदुखी

शिंदे-फडणवीसांची वाढली डोकेदुखी

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण आता यशवंत सेनेचे धनगरांना तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने धनगरांना आरक्षण न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा यशवंत सेनेकडून शिंदे-फडणवीस सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातल्या टाकरवन गावात बिरुबा देवाच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेत यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोनार यांनी उपस्थिती लावत धनगर समाजाचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी धनगर आरक्षणाची मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने धनगरांना आरक्षण जाहीर करायला हवं, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचं यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोनार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिबवा संघटनेचे अध्यक्ष मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांच्या टीकेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमी आंदोलकांची माफी मागितली असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहे. मराठा आंदोलनावरून राजकीय वाद पेटलेला असतानाच आता धनगरांना आरक्षण देण्याची मागणी होत असल्याने त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री