Tuesday, July 02, 2024 09:00:36 AM

आता मराठा -ओबीसी वाद पेटण्याची चिन्ह

आता मराठा -ओबीसी वाद पेटण्याची चिन्ह

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत, पण हे राज्यभरातील आंदोलन काही थांबण्याचे नाव घेत नाही. असे असताना, कॉँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, ‘ मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्या,’ अशी मागणी केली आहे. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी,’मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणे लावून देऊ नका’, अशी भूमिका घेतलेली असतानाच, राज्याचे मंत्री आणि संत परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी,’ओबीसी आरक्षण अबादीत ठेऊन मराठ्यांना आरक्षण द्या,’ अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे येत्या काळात आरक्षणावरून मराठा- ओबीसी संघर्ष अधिक टोकदार होणार आहे.

२०१६ पासून सकल मराठा समाज या बॅनरखाली मराठा समाज मूक मोर्चातून आपली मागणी लावून धरत आहे. तेव्हाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मागासवर्ग आयोग निर्माण केला. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगाने आपला अहवाल दिला होता. तो तत्कालीन फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्त केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याबाबची याचिका प्रलंबित आहे. जेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा ओबीसी आरक्षणानातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असा मुद्दा आला होता, तेव्हा छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध केला होता, हा इतिहास आहे.

असे असताना आता ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे यासाठी कॉँग्रेससचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आग्रही आहेत. असे असताना छगन भुजबळ आणि पटोले यांनी विरोधात भूमिका घेतल्याने आगामी काळात आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी वाद रंगण्याची चिन्हे आहेत. असे एकीकडे असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही,’ असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात येत्या काळात काय काय घडामोडी होणार आहेत, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबतचा वाद केंद्रानेच मिटवावा, अशीही मागणी जोर धरत आहे.


सम्बन्धित सामग्री