जालना, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसांपासून उपोषण करत असलेल्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीमार केला.
मराठा मार्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह दहाजण २९ ऑगस्टपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. उपोषण करत असलेल्या वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस घेऊन जात होते. यावेळी आरक्षण समर्थक आणि पोलीस यांच्यात वाद झाला. मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून पोलिसांना विरोध झाला. काही जणांनी दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर परिस्थिती चिघळत गेली.
जालन्यात घडलेल्या घटनेनंतर राज्यात काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. पोलिसांचा निषेध करण्यासाठी जमावाने जाळपोळ करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले.