मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : सत्ताधारी पक्षाच्या एनडीए आघाडीला आव्हान देण्यासाठी आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची एकजूट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईत आज आणि उद्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीकडून देखील आज आणि उद्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ‘इंडिया’ आघाडीच्या नावावरच टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विरोधकांनी त्यांच्या आघाडीला दिलेल्या नावाला मान्यता मिळाली असली तरी त्यांनी ‘इंडिया’ नावाला टींब लावून दुष्कृत्य केले आहे. ‘इंडिया’ नावाला टींब लावणे योग्य नाही. ‘इंडिया’ आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे, पण २६-२८ पक्षांपैकी काही पक्ष असे आहेत की, ज्यांना एक मतही मिळत नाही. फक्त मोदींचा विरोध करण्याकरता २०१४ किंवा २०१९ प्रमाणे पुन्हा एकदा प्रयोग करत आहेत. विरोधकांकडून बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण याची दारू केव्हाच निघाली आहे. त्यांचा फुसकी बॉम्ब झाला आहे. हा बॉम्ब काही कामाचा नाही आहे. अनेक नेते दुरावलेले आहेत. ते आज एकत्र येत असले तरी त्यांची तोंड विरुद्ध दिशेने आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पूर्णपणे गेलेला आहे. देशात जिंकून येण्यासाठी युती करत आहेत, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची बैठक नाही तर ‘घमेंडिया‘ची बैठक होत आहे, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे ज्याला ‘गरूड झेप‘ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. मोदी यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना याच टोळीने शंभर कोटी वसुली केली होती. कोरोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला.