मुंबई, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : चीनने सोमवारी अधिकृतपणे त्यांच्या नकाशाची सन २०२३ मधील आवृत्ती प्रसिद्ध केली. यात चीनने अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन प्रदेश, तसेच तैवानसह इतर वादग्रस्त प्रदेश आपल्या नकाशात दाखवले आहेत. यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारताने हे भाग आधीही भारताचे अविभाज्य भाग होते आणि यापुढेही राहतील, असे ठणकावून सांगितले आहे. तर काँग्रेसनेही चीनवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. उद्धव गटाच्या संजय राऊत यांनी या मुद्यावरून मोदी सरकार विरोधात टोलेबाजी केली.
'चीनच्या नकाशाची सन २०२३मधील आवृत्ती अधिकृतपणे सोमवारी प्रसिद्ध झाली. नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या मानक नकाशा सेवेच्या वेबसाईटवर ही नवी आवृत्ती प्रसिद्ध झाली. हा नकाशा चीन आणि जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सीमा रेखाटण्याच्या पद्धतीच्या आधारे संकलित करण्यात आहे,' असे चीनचे अधिकृत वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने सोमवारी 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केले.
'यापूर्वीही चीनने केले आहेत असे दावे'
भारतीय भूभाग आपला असल्याचा चीनचा दावा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पूर्णपणे फेटाळून लावला. जयशंकर म्हणाले की, चीनने नकाशात जे क्षेत्र स्वतःचे म्हणून दाखवले आहेत ते त्यांचे नाहीत. असे करण्याची चीनची जुनी खोड आहे. अक्साई चीन आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. यापूर्वीही चीन भारताचे काही प्रदेश आपले असल्याचे दाखवून नकाशे काढले आहेत. त्यांच्या दाव्याने काहीही होत नाही. आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे. दुसऱ्याची क्षेत्रे आपली आहेत, असे निरुपयोगी दावे करून काहीही होत नाही.
संजय राऊतांची टोलेबाजी
'आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी झाले होते आणि त्यांनी शी जिनपिंग यांचे अभिनंदन केले. त्यानंतर चीनचा हा नकाशा येतो. केंद्र सरकारमध्ये हिंमत असेल, तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करावा,' असा टोला राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला.