संभाजी नगर, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: एकीकडे लाल किल्ल्यावरून आणि मुंबईतून शेतकऱ्यांसाठी तोंड देखले पणा करायचा आणि दुसरीकडे शेतकऱ्याचा जीव घेण्याचे काम धोरणाच्या माध्यमातून केले जातेय. हा देश शेतकऱ्यांचा आहे की,कारखानदारांचा आहे,असा प्रश्न पडतो. देशातील केंद्र सरकार दुतोंडी भूमिका बजावत आहे. एकीकडे कापसाचे आयात शुल्क कमी करून दुसरीकडे कांद्याचे निर्यात शुल्क वाढवले जातेय अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कांदा निर्यात शुल्कप्रकरणी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त त्यांनी वेरुळ येथील घृश्नेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकेकाळी कांदा पन्नास पैसे किलोच्या दराने विक्री होत होता. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांसाठी साडेतीनशे रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र, ते अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. अशी परिस्थिती असताना आता पुन्हा काद्यावर निर्यात शुल्क लावण्यात आल्याने अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.