मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुऱ्यातील जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने जमीन मालकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, जमीन मालकाला ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त आणि बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समूह पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याबाबतचा शासन निर्णय गृहनिर्माण विभागाने काढला होता. हा प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक बाबींना मंजुरी देण्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली होती. यातील बैठकीत कामाठीपुरा विकास समितीने मागणी केल्यानुसार, कामाठीपुरा क्षेत्रातील जमीन मालकाला मोबदला देण्याच्या अनुषंगाने ५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे एक घर, ५१ चौरस मीटर ते १०० चौरस मीटर भूखंडाकरिता ५०० चौरस फुटांची दोन घरे, १०१ चौरस मीटर ते १५० चौरस मीटर भूखंडाकरिता ५०० चौरस फुटांची तीन घरे, १५१ चौरस मीटर ते २०० चौरस मीटर भूखंडाकरिता ५०० चौरस फुटांची चार घरे आणि त्यापुढील प्रत्येक ५० चौरस मीटर भूखंड क्षेत्रफळाकरिता ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे अधिक घर देण्याबाबत समितीने मंजुरी दिली होती.