२३ ऑगस्ट, २०२४, मुंबई : मुंबईतल्या पवई येथील गौतमनगरमध्ये पाईप लाईन फुटली आहे.ही पाईपलाईन तानसा तलावाला जोडणारी मुख्य पाईपलाईन पैकी एक आहे. तानसा तलाव – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक तलाव आहे. त्यामुळे यामुळे दादर, माहीम, माटुंगा, अंधेरी (पूर्व), विलेपार्ले, वांद्रे (पूर्व), वांद्रे टर्मिनस, सांताक्रुज, माहीम आणि माटुंगा यासह मुंबईतील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेनुसार, पवईमध्ये दुपारी ३:३० च्या सुमारास गळती झाली. त्यानंतर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाणीगळती तातडीने थांबवण्यात आली. या पाणी गळतीचे व्हिडिओ आणि फोटोज समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओजमध्ये हजारी लिटर पाणी वाया जाताना दिसत आहे.
“पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आम्हाला व्हॉल्व्ह वेगळे करावे लागतील ज्यामुळे के/पूर्व, एच/पूर्व आणि जी/उत्तर वॉर्डांसह तीन महापालिका वॉर्डातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. जोपर्यंत गळती पूर्णपणे दुरुस्त होत नाही तोपर्यंत या वाहिनीद्वारे पुरवठा पुन्हा सुरू करता येणार नाही,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.