मुंबई : घाटकोपर येथील अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी भावेश भिंडे याने मुंबईच्या उच्च न्यायालयात एक याचिका केली आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही देवाची करणी असल्याचा दावा याचिकेद्वारे भावेश भिंडे याने केला आहे. देवाची करणी असल्यामुळे पोलिसांनी नोंदवलेले गुन्हे रद्द करावे आणि तुरुंगातून मुक्तता करावी, अशी मागणी भावेशने केली आहे.
मुंबईत १३ मे २०२४ रोजी ताशी ८९ ते १०२ किमी वेगाने वारे वाहू लागले आणि धुळीचे वादळ आले. हे वातावरण मुंबईसाठी एकदम अनपेक्षित असे होते. हवामान विभागाने या वातावरणाचा अचूक अंदाज जाहीर केला नव्हता. जे वातावरण निर्माण झाले ते कोणत्याही बांधकामाचे नुकसान करण्यास सक्षम होते. अनेक झाडं पण वादळी वाऱ्याच्या तडाख्याने उन्मळून पडली होती. यामुळे १३ मे रोजी घडलेली घटना ही दुर्घटना नसून देवाची करणी असल्याचा दावा भावेश भिंडेने केला आहे.