मुंबई : मुंबईची वाढती लोकसंख्या आणि प्रत्येक घरामागे असलेले स्वतःचे खाजगी वाहन यामुळे मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता . मात्र, आता हा वाहतूककोंडीचा विळखा तोडून वेळ आणि इंधन बचत करणाऱया कोस्टल रोड प्रकल्पावरील मरीन ड्राइव्हवरून वांद्रेकडे जाणाऱया दिशेने कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणारा तिसरा आणि शेवटचा गर्डर बसवण्याचे काम आज सकाळी पूर्ण झाले. हा गर्डर 60 मीटर लांब आणि 560 टनाचा असून याआधी अशाच वजनाचे दोन गर्डर बसवण्यात आले आहेत. ही मार्गिका जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुली होणार आहे. दरम्यान, कोस्टल रोड शिवडी-न्हावा शेवा उड्डाणपुलाला जोडला गेल्यानंतर हा संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेला ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ सागरी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत प्रकल्पाचे 93.5 टक्के काम पूर्ण झाले आहे. सुमारे 14 हजार कोटी खर्च करून प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे.

मरीन ड्राइव्ह ते वांद्रे 12 मिनिटांत
10.58 किमीचा कोस्टल रोड आणि 4.5 किमी लांबीचा वांद्रे वरळी सी लिंक जोडण्यासाठी आज तिसरा आणि शेवटचा महाकाय गर्डर बसवण्यात आला. यावरून जानेवारी महिन्यात सिमेंट-काँक्रीट, अस्फाल्ट करणे अशी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर 15 जानेवारीनंतर वरळी ते वांद्रे सी लिंक असा थेट प्रवास केवळ 12 मिनिटांत करणे शक्य होणार आहे. यामुळे काम संपताच फेब्रुवारीपासून कोस्टल रोड पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होणार आणि मरिन ड्राइव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटे असा जल्लद प्रवास आता मुंबईकरांना करता येणार आहे. कोस्टल रोड मुंबईकरांसाठी लाभदायक ठरेल कारण वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती खरेदी यामुळे होणारी वाहतूककोंडी आता दीर्घकाळ टिकणार नाही तर दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुसाट करणार आहे.