मुंबई, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : ९ एप्रिललाच गुढीपाडवा आला असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी हा आकडा शुभ मानला जातो. त्यामुळे हा शुभशकुनच मानला जात आहे. भाजपाने चर्चेकरिता दिल्लीला बोलावल्यानंतर राज्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भरणारा हा मेळावा पक्षाच्या शक्तिप्रदर्शनाची गुढी उभारणारा ठरणार का?, याबाबत उत्सुकता आहे. या दिवशी होणारा मेळावा पक्षात प्राण फुंकणारा ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. शिवाजी पार्कात होणाऱ्या या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे काय संदेश देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
आपली ताकद यावेळी दाखवून द्या, अशा सूचना पक्षाकडून आल्याने मेळाव्याच्या आयोजनासाठी मनसेच्या मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यभरातील कार्यकर्त्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शिवसेना भवनपर्यंत गर्दी होईल इतके कार्यकर्ते मेळाव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर जमतील, अशी ग्वाही मुंबईतील एका मनसेच्या नेत्याने दिली.