मुंबई, दि. १५ मार्च, २०२४, प्रतिनिधी : मुंबईच्या पाणी पुरवठ्यात २४ एप्रिल २०२४ पर्यंत पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भांडूप जलशुद्धीकरण केंद्राच्या परिरक्षण कामांमुळे ५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे. भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. आशिया खंडातील हे सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. भांडूप संकुल येथे १ हजार ९१० दशलक्ष लीटर आणि ९०० दशलक्ष लीटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट्स आहेत. त्या पैकी ९०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे प्रतिदिन ९९० दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. पालिकेकडून नागरिकांना पाण्याचा जपून आणि कटकसरीने वापर करावा अशी विनंती करण्यात आली आहे.