नवी मुंबई, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून बेस्ट बसगाड्यांवर वायुशुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात आली आहे. एकूण २४० बसवर ही यंत्रणा कार्यान्वित झाली असून, पुढील १५ दिवसांत आणखी ६० बसवर ती बसवण्यात येणार आहे.
वायु शुद्धीकरण यंत्रणेच्या २४० बसगाड्या आणिक, मरोळ, कुर्ला, वांदे, कुलाबा आणि वरळी या आगारातून प्रवर्तित होतात. या यंत्रणेमध्ये प्रदूषित वायू रोखण्यासाठी मोटार ब्लोअर युनिट आणि हेपा फिल्टरची सोय आहे. ही यंत्रणा बेस्ट उपक्रमाच्या धावत्या बसगाड्यांवर कार्यरत असल्याने ज्या ठिकाणी वायु प्रदूषण निर्माण होते, त्याच ठिकाणी वायु शुद्धीकरण यंत्रणेद्वारे प्रदूषित वायूचे शुद्धीकरण करण्यात येते. अशा प्रकारे या यंत्रणेमुळे वाहनांतून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण करण्यास मदत होत असल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे.