Sunday, October 06, 2024 03:08:53 AM

महाराष्ट्राच्या २०३५ मधील विकासाचे मानचित्र

महाराष्ट्राच्या २०३५ मधील विकासाचे मानचित्र

मुंबई, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे जपानमधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मला मिळाली. ही पदवी मी माझ्या महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो. राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल, अशा भावना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांनी २०३५ मध्ये ७५ वर्षे पूर्ण करीत असलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे मानचित्र तयार करत असल्याचे सांगितले..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी कोयासन विद्यापीठाने १२० वर्षांच्या - इतिहासात प्रथमच देशाबाहेरील मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला. मुंबई विद्यापीठाच्या जहांगीर कावसजी सभागृहात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अतिशय भावोत्कट मनोगत व्यक्त केले. भारत जपानच्या मैत्री संबंधांचा आढावा घेताना त्यांनी महाराष्ट्र विकासाचा रोडमॅप मांडला. ते म्हणाले की, कोयासन विद्यापीठ हे कू काई यांनी सुरू केले. त्यांनी बुद्धिझम जपानमध्ये रुजवला. जगातील महत्वाचे केंद्र म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यांनी हा सन्मान दिल्याबद्दल या विद्यापीठाचा मी ऋणी आहे. मी दीक्षाभूमीच्या शहरातून येतो. त्यामुळे या क्षणी भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. महाराष्ट्र – कोयासन मैत्रीची सुरुवात तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या काळात झाली. त्यानंतर मुख्यमंत्री असताना मी तिथे गेलो. भारतरत्न डॉ .बाबासाहेबांचा पुतळा तेथे आपण बसवला. आताही ही मैत्री निरंतर सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस यांनी सांगितले. जपानने सातत्याने भारताला आणि महाराष्ट्राला मदत केली. जपान हा आपला अतिशय जवळचा आणि विश्वासू मित्र आहे. त्यामुळेच हा केवळ मैत्रीचा नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या जोडणारा अध्याय आहे. कोयासन विद्यापीठाने डॉक्टरेट देताना पायाभूत विकास, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समता या गोष्टीचा विचार केल्याचे ते म्हणाले.

'आपल्या राज्याने पायाभूत क्षेत्र विकासासाठी २०१४ साली काम सुरू केले. मुंबईच्या पायाभूत क्षेत्र विकासात जपानचा मोठा वाटा आहे. आपली भुयारी रेल्वे, ट्रान्स हार्बर लिंक, समुद्र सेतू यासह अनेक प्रकल्पासाठी मोठी मदत जपान सरकारने केली आहे. याशिवाय, शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रात मदत जपानने केली आहे. आगामी काळात वर्सोवा ते विरार ही सी लिंक तयार करण्याची चर्चा झाली आहे. पूरनियंत्रण क्षेत्रात जपानची मदत घेऊन काम केले जाणार आहे. आता आपण या क्षेत्रात अशा ठिकाणी आहोत की इतर राज्यांना आपल्या पर्यंत पोहो पोहोचायला खूप वेळ लागेल', असे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधा ही विकासाची गुरुकिल्ली आहे. आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत क्रमांक एकचे राज्य आहे. महाराष्ट्र हे स्टार्ट अप कॅपिटल झाले आहे. कोणतेही राज्य पुढे न्यायचे असेल तर चांगल्या प्रशासनाची गरज असते आणि महाराष्ट्र हे त्यासाठी ओळखले जाते. आपण २०१४ ते २०१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम केले. त्यामुळे देशाच्या तुलनेत राज्यातील जमिनीची पाणी पातळी उंचावण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र हे असीमित शक्ती असणारे राज्य आहे. नवभारत निर्माणासाठीचा रस्ता महाराष्ट्रातून जातो. सामाजिक समतेचा मोठा इतिहास. डॉ.बाबासाहेबांनी संविधनाद्वारे संधीची समानता दिली. त्यामुळे आपण सर्व समाज घटकांना पुढे कसे नेता येईल, त्यांना शिक्षणाची संधी, शिष्यवृत्ती याद्वारे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. या राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  

सम्बन्धित सामग्री