मुंबई, १० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रचंड भीमसागरासाठी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी एक मागणी केली आहे. चैत्यभूमीवर अभिवादन करणं शक्य व्हावं, यासाठी मुंबईत सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुटी जाहीर करा, अशी मागणी करणारं पत्र प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.
बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी आणि गरीब, दलित व मागासवर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात. मात्र, या दिवशी सर्व कार्यालये सुरू असल्याने अनेक अनुयायींना महामानवास अभिवादन करणे शक्य होत नाही. राज्यातील अनेक संघटना याच पार्श्वभूमीवर बऱ्याच वर्षांपासून सुटी मिळावी, अशी मागणी करत आहेत. त्यातच ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी समन्वय समितीने मुंबईत स्थानिक सुटी जाहीर करण्याबाबतची शिफारस शासनाला केली आहे, अशी माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. बाबासाहेबांचे समता व बंधुता हे विचार जनसामान्यांमध्ये रूजणे फार गरजेचं आहे. त्यासाठीच या दिवशी म्हणजेच बाबासाहेबांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करणारं पत्र प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.