मुंबई, २६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईकरांसह पर्यटकांची पसंती असलेला निसर्गरम्य पवई तलाव आता स्वच्छ सुंदर होणार आहे. या तलावाच्या पाण्यावर तरंगणाऱ्या जलपर्णी वनस्पती, जमिनीतून उगवलेल्या वनस्पती तसेच टाकाऊ पदार्थ यंत्राच्या मदतीने काढण्यात येणार आहेत.
पवई, विहार आणि तुळशी तलावाची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये पवई हा तलाव मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणारा निसर्गरम्य तलाव आहे. त्यामुळे या तलावाला विशेष महत्व आहे. तलावाचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आणि जीवसृष्टीचे संगोपन करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे तलावात सांडपाणी आणि कचरा अनधिकृतपणे टाकण्याचे प्रमाण वाढले आले. त्यामुळे सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. जलपर्णी वाढीमुळे तलाव झाकोळून जात आहे. पाण्याची गुणवत्ता आणि जैवविविधतेवर परिणाम होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर तलावाची स्वच्छता करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी अंदाजे ९ कोटी ८८ लाखापर्यंतचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सुद्धा पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.