मुंबई, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी लागू करण्यात आली आहे. बंदी घातलेल्या पिशव्यांचा वापर करताना आढळल्यास पाच हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत भरारी पथकांनी दुकानं, फेरीवाले, मॉल येथे पाहणी करायला सुरुवात केली आहे. व्यावसायिक आस्थापनांच्या ठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे आढळल्यास थेट दंड लागू केला जाणार आहे.
प्लास्टिकच्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होण्यास लाखो वर्षे लागतात. या पिशव्या सांडपाणी वाहून जाण्याच्या मार्गात अडकून राहतात. यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. याच कारणामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने पालिकेच्या हद्दीत प्लास्टिकच्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यास बंदी घातली आहे. मुंबईत ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिकच्या सर्व वस्तू वापरण्यास मुभा आहे.
प्लास्टिकला पर्याय म्हणून वापरता येतील अशा वस्तू
कापडी पिशवी, कागदी पिशवी, पदार्थांसाठी भांडी तसेच द्रव पदार्थांसाठी काचेची भांडी यांचा वापर करणे शक्य आहे. हे पर्याय वापरले तर प्लास्टिकच्या पिशव्या टाळून वस्तू किंवा द्रवपदार्थ सुरक्षितरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे शक्य आहे.