मुंबई, २० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा. कोकणातील गणेशोत्सवाची लगबग आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटीचं एक अतूट नातं आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांच्या सेवेत एसटी धावत असते. परंतू यंदा गणोशोत्सवासाठीचा हाच एसटीचा प्रवास मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी शिंदे गटाकडून मोफत करुन देण्यात येणार आहे.
मुंबईतील प्रत्येक विधानसभेतून १२ ते १८ मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. शनिवार २० ऑगस्ट रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या बसेस संदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान राज्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. त्याचबरोबर पक्षाचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोकणवासीयांना मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोल्हापूर मार्गे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णयदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून या बैठकीत घेण्यात आला आहे.
कोल्हापूर मार्गे गेल्यास मुंबई-पुणे महामार्गावर आणि इतर टोलनाक्यांवर ६०० ते ७०० रुपयांचा टोल माफ करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई शहरासह पालघर येथील नागरिकांसाठीही जवळच्या पोलीस स्थानकातून आरटीओकडून पास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.