१० ऑगस्ट, २०२४, नगर : अहमदनगर जिल्ह्यातील तहानलेल्या दुष्काळग्रस्त भागाला शनिवारी निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेकडो गावातील पिण्याचे तलाव आणि शेतीला मोठा फायदा होणार आहे. यावेळी निळवंडे धरणाच्या निर्मितीची स्वप्नपूर्ती झाल्याची भावना यावेळी विखे पाटलांनी व्यक्त केली आहे.
गेल्या पाच दशकांपासून चातकाप्रमाणे पाण्याची वाट पाहणा-या निळवंडे धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या आयुष्यात आता आनंदाचे क्षण बघायला मिळत आहेत. गेल्यावर्षी पूर्णत्वास गेलेल्या निळवंडे धरणाचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता कालव्यातून प्रत्यक्ष पाणी लाभक्षेत्रात पोहचणार आहे. शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी धरणाच्या पाण्याचे विधीवत पूजन करत कालव्यातून पाणी सोडले. १८२ गावातील तहानलेल्या नागरीकांना यातून पाणी मिळणार आहे. याबाबत 'धरण निर्मीतीची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद आहे', अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.