मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गतवर्षी तीन जिल्ह्यांच्या नावात बदल केला आहे. मात्र त्यांच्या मतदारसंघांच्या नावातही बदल होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०२६ ला महाराष्ट्रातील ५ विधानसभा मतदारसंघांच्या नावात बदल होणार आहे. परंतु डिलिमिटेशन म्हणजेच परिसीमण झाल्याशिवाय बदल करता येत नाही. डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेनंतर निवडणूक आयोग मतदारसंघांची नावे बदलणार आहे. मतदारसंघांच्या नावात बदल करण्याचा अधिकार हा फक्त मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला (डिलिमिटेशन कमिशन) असतो.
यावर्षी तीन जिल्ह्यांच्या नावात बदल झाला त्यातीलच एक म्हणजे औरंगाबाद (संभाजीनगर) होय. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ पैकी ३ नावात बदल होणार आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे नाव छत्रपती संभाजीनगर मध्य, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे नाव छत्रपती संभाजीनगर पश्चिम तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे छत्रपती संभाजीनगर पूर्व असे करण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहर मतदारसंघाचे नाव अहिल्यानगर शहर होणार आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद मतदारसंघाचे नाव धाराशिव मतदारसंघ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या तीन लोकसभा मतदारसंघाची नावे देखील बदलणार आहेत. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामकरण करण्यात येणार आहे.