पुणे : आज पुण्यात तिसरे विश्व मराठी संमेलन पार पडले. हे मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. आज या संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अभिनेता रितेश देशमुख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषेसह विविध विषयांवर भाष्य केलं. राज्य सरकारने आणि आम्ही-तुम्ही सर्वांनी आपली मराठी भाषा टिकवली पाहिजे, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.' या वेळी बोलताना ‘अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो’, असं म्हणत राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली.
राज ठाकरे म्हणाले, “तुमच्या मनात आलं असेल की मी या ठिकाणी कसा? हा शासनाचा कार्यक्रम आहे. पण मला उदय सामंत यांनी या कार्यक्रमासाठी बोलावलं. त्यामुळे मला तुमचं सर्वांचं दर्शन झालं. त्यासाठी मी उदय सामंत यांचे आभार मानतो. माझे मित्र अभिनेता रितेश देशमुख यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. ही सर्व भाग्यवान माणसं. मी पुरस्कार दिला म्हणून नाही तर, यांना पुरस्कार मिळाला म्हणून.आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो. तो घेऊन आम्हाला पुढे वाटचाल करावी लागते.'
हेही वाचा - 'माझी बायको बघत असेल…' रोहित शर्माचं स्मृती मंधानाच्या 'त्या' प्रश्नावर उत्तर, सर्वांनाच आलं हसू
“दुसऱ्या राज्यातील माणसं हे आपल्या देशाशी आणि भाषेशी खूप प्रामाणिक असतात. तसेच, आपणही असायला हवे. इतर राज्ये त्यांच्या भाषेविषयी अभिमान बाळगत असतील तर, आपणही आपल्या मराठी भाषेविषयी तशीच भूमिका घेतली पाहिजे. आपण एकमेकांना भेटल्यानंतर दुसऱ्या भाषेत का बोलतो? देशात इतर कोणत्याही राज्याचे राज्यगीत नाही. महाराष्ट्र हे एकमेव राज्य असे आहे, की ज्याचे स्वतःचे राज्यगीत आहे. इतिहास म्हणजे भूगोल. कोणताही एखादा भूभाग मिळवला की, बनतो तो इतिहास. भूगोलाशिवाय इतिहास नाही. प्रगतीच्या नावाखाली जमीन जात असेल, तर त्याला विकास म्हणता येणार नाही, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - सानिया मिर्झाने दुबईतील घरातून शोएब मलिकचं नाव हटवलं, आता लिहिलंय 'या' व्यक्तीचं नाव
“ज्या हिंद प्रांतावर १२५ वर्ष कोणी राज्य केलं असेल तर ते फक्त मराठ्यांनी केलं. ज्यांनी १२५ वर्ष राज्य केलं, त्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण जपायची नाही तर कोणी जपायची? आता कार्यक्रमाच्या आधी उदय सामंत यांनी मला सांगितलं की मराठी भाषेसाठी तुम्ही जे सांगतान त्यासाठी आम्ही मदत करू. ते मदत करतील अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेसाठी जे-जे आम्ही करू त्यासाठीही ते पाठिंबा देतील अशी देखील अपेक्षा आहे. पण तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करू नका. आतापर्यंत आलेला अनुभव आहे. कारण आम्ही जे करत आहोत ते मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठीच करत आहोत”, असेही राज ठाकरे म्हणाले.
मराठी माणसाला हिमाचलमध्ये जमीन घेता येत नाही
राज ठाकरेंनी राज्यात परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यांवरून सरकारवर टीका केली. भारतीय असूनही मराठी माणसाला दुसऱ्या राज्यात जमीन घेता येत नाही. महाराष्ट्रातील जमीन मात्र परप्रांतीयांच्या ताब्यात चालली आहे. शहरातील मराठी माणूस बेघर होत आहे, असा घणाघात राज यांनी केला.
शहरांमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. आपलेच लोक आपल्याच राज्यात बेघर होणार असतील तर, त्याला विकास म्हणत नाहीत. सध्या मात्र, महाराष्ट्रात तुम्ही या आणि आमची जमीन घेऊन जा अशी स्थिती आहे, असे राज ठाकरे म्हणाले.