Bird Flu Outbreak in Maharashtra
Edited Image
महाराष्ट्रातील एका गावात 6,831 कोंबड्यांचा गूढ मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर प्रशासनाने संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून, कोंबड्यांच्या अशा गूढ मृत्यूमागे नेमके काय कारण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. विदर्भात बर्ड फ्लू (H5N1 विषाणू) चा धोका वाढला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खेर्डा (जिरापुरे) गावात असलेल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये 8 हजार पैकी 6,831 कोंबड्यांचा गूढ मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही घटना उघडकीस आली, त्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली.
दरम्यान, 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान, पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मृत कोंबड्यांचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. नंतर, पुण्यातील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्था आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेतही नमुन्यांची तपशीलवार तपासणी करण्यात आली.
हेही वाचा - Bird Flu Scare: महाराष्ट्रात माणसाला बर्ड फ्लूची लागण? धोका वाढला!
अहवालात झाला कोंबड्यांच्या मृत्यूचा खुलासा -
तथापी, प्रयोगशाळेतील अहवालांमध्ये कोंबड्यांच्या गूढ मृत्यूचा उलगडा झाला. या रिपोर्टनुसार, बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं. ज्यामध्ये कोंबड्यांनी H5N1 विषाणूची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली. या वृत्तानंतर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे. बाधित पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.
हेही वाचा - नागपुरात ''बर्ड फ्लू''चा उद्रेक
पोल्ट्री फार्ममधून कोंबड्यांची वाहतूक आणि विक्रीवर बंदी -
याशिवाय, बाधित पोल्ट्री फार्ममधील उर्वरित कोंबड्यांना मारण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पोल्ट्री फार्ममधून कोंबड्यांची वाहतूक आणि विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, तहसीलदारांच्या देखरेखीखाली प्रत्येक तालुक्यात विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, ज्या सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रशासनाने लोकांना सतर्क केले आहे. तथापी, बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत.