नाशिक आणि जळगावमधील संपत्तीवर ईडीचा छापा
जळगाव : स्टेट बँक ऑफ इंडीयाकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा.लि.ची एक कोटी 69 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. नाशिक आणि जळगावमधील संपत्तीचा यात समावेश आहे. ईडीच्या नागपूर कार्यालयाच्यावतीने 12 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या या कारवाईची माहिती ईडीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
आरएल समुहाने स्टेट बँक ऑफ इंडीयाकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी स्टेट बँकेने दिल्ली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे. त्यानुसार 17 ऑगस्ट 2023 रोजी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या पथकांकडून जळगावात तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीकडून तपासणी व कारवाई केली जात होती. आता पुन्हा 12 फेब्रुवारी रोजी ईडीच्या नागपूर उप विभागीय कार्यालयाने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा.लि.ची नाशिक आणि जळगावमधील एक कोटी 69 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
या समुहाचे संचालक आणि इतर वेगवेगळी बेनामी मालमत्ताधारकांचा यात समावेश असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तर याबाबत आर एल ज्वेलर्सचे संचालक मनीष जैन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
ईडीच्या कारवाईमुळे नाशिक आणि जळगावमधील व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्टेट बँकेचे मोठे कर्ज थकवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून यापुढे आणखी काही मालमत्तांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. नागपूर उपविभागीय कार्यालयाने ही कारवाई करून मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड केला आहे.