१६ जुलै २०२४, जळगाव : जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी आदिवासी टोकरे कोळी समाज्याच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी, १६ जुलै रोजी अमळनेर तहसीलदार कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी टोकरे कोळी समाजामधील तरुणांना जात वैधता प्रमाणपत्र सुरळीत रित्या मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाचे नियम असतानाही जाणीवपूर्वक रित्या हा दाखला मिळू न देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आदिवासी टोकरे कोळी समाजाकडून केला जात आहे. 'याविरोधात आमचा लढा सुरूच राहणार आहे, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकीत सरकारला धडा शिकवला जाईल आणि मुख्यमंत्री यांना साडी चोळीचा आहेर दिला जाईल' असा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला.