शहर हादरलं! तरुणीवर दोन ठिकाणी अमानुष अत्याचार, सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चिंता
मुंबई : भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. एका 22 वर्षीय तरुणीवर निर्घृण सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही भयावह घटना भिवंडीच्या बागे फिरदोस परिसरात घडली. पीडित तरुणी आणि तिचा भाऊ या भागातून जात असताना, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. आरोपींनी तरुणीच्या भावाला आणि सोबत असलेल्या रिक्षा चालकाला अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला नागाव परिसरातील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
इतक्यावरच न थांबता, आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने फातिमा नगर परिसरात नेले. तिथे एका पिकप बोलेरो गाडीत तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यात आले. या अमानुष घटनेमुळे भिवंडी शहरात संतापाची लाट उसळली आहे.
तेलंगणात श्रीशैलम प्रकल्पाच्या बोगद्यात मोठी दुर्घटना, आठ जण अडकले
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला हा गुन्हा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता, मात्र पुढील तपासासाठी तो शांतीनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
शहरात संताप आणि भीतीचे वातावरण
या घटनेनंतर शहरात संताप आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. भिवंडीतील स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी होत आहे.
शांतीनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेचा प्राथमिक तपास वेगाने सुरू असून, उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भिवंडी परिसरात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे, असं नागरिकांचं मत आहे.
सध्या पोलिसांनी एकाला अटक केली असून, उर्वरित आरोपी लवकरच गजाआड होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने कळवावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.