पिंपळगाव लेंडी: महाशिवरात्रीनिमित्त पिंपळगाव लेंडी येथील निर्मळेश्वर यात्रेला आलेल्या भाविकांवर अचानक मधमाशांचा हल्ला झाला. या हल्ल्यात शंभरावर भाविक जखमी झाले असून त्यातील 15 जणांची प्रकृती गंभीर आहे.
ही घटना काल (26 फेब्रुवारी) सकाळी 10 आणि दुपारी 3 च्या सुमारास दोन वेळा घडली. आग्या मोहोळाच्या मधमाशांनी अचानक यात्रेत हल्ला चढवल्याने मोठा गोंधळ उडाला. काही जणांनी धावाधाव करत आपला जीव वाचवला, तर काहींना मधमाशांनी चावे घेतले.
यात्रेत सहभागी भाविकांसह रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांनाही मधमाशांच्या हल्ल्याचा फटका बसला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एका टिप्परमध्ये धूर करण्यात आला, परंतु तोपर्यंत अनेकजण जखमी झाले होते.
हेही वाचा :Buldhana: जाणून घ्या; टकल्या गावाची कहाणी
जखमींना तातडीने उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात तर काहींना सिंदखेड राजा येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर यात्रेत काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
यात्रोत्सवासाठी आलेल्या हजारो भाविकांमध्ये घबराट निर्माण झाल्याने काही काळ उत्सवामध्ये खंड पडला. प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
– प्रतिनिधी, जय महाराष्ट्र